Wednesday, May 10, 2006

पुस्तकाबाहेरचा किडा

बरेच दिवसात blog कडे फिरकणंही झालं नाही. संसार, दुसरं काय? संसार मधे म्हणे "सृ" धातु आहे - "सृ" म्हणजे सरणे किंवा संपणे. पण संसारात काम, काळज्या, दमणूक या गोष्टी संपत नाहीत, संपतो तो फक्‍त वेळ! अर्थात हा झाला फक्‍त "excuse", कारण म्हणतात ना, when there is a will, there is a way.
मला tag केलं अशी "बातमी" कळली. "पुस्तकनिष्ठांची मांदियाळी" साठी माझ्यासारख्या पुस्तकाबाहेरच्या किड्याला tag करायचं म्हणजे आडाण्याला गणितज्ञांच्या परिषदेला बोलावण्यासारखं आहे. ज्यांनं एकूणातच पाच पुस्तकं वाचलेली आहेत, त्याला आवडणारी पाच पुस्तकं विचारून चांगलंच अडचणीत टाकण्यात आलंय ! अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला वाचनाची वगैरे फार काही आवड नाही. म्हणजे नावड आहे असं नाही पण अगदी रात्री जागून पुस्तकं वाचणं आपल्याला नाही बुवा जमत. या बाबतीत मी पुलंच्या धोंडो भिकाजी जोश्यांसारखी आहे. रोजचं वर्तमानपत्रं हाती घेणं झालं तरी मी स्वत:ला धन्य समजते. तरीपण आलिया भोगासी असावे सादर :-), आता tag केलंय म्हटल्यावर काहीतरी लिहिणं आलंच की नाही!

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
फुलवा - डॉ श्रीश क्षीरसागर
२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
निसर्गप्रेमी लोकांनी प्रेमात पडवे असे पुस्तक. लेखकाला अतिशय जवळून ओळखण्याचं भाग्यं मला आहे, म्हणून हे पुस्तक माझ्या हाती आलं. अजून मी फक्‍त अर्ध्यावरच आहे, पण फार मोहवून टकणारं पुस्तक आहे हे. लोकसत्तेत प्रकाशित झालेल्या "फुलवा" या रानफुलांच्या माहितिप्रद लेखमालेवर हे पुस्तक आढरित आहे. शास्त्रशुद्ध माहिती इतक्या आकर्षक रितीने मांडणं हा तर श्रीशचा हातखंडच आहे. आपल्या ओळखीचीच फुलं मला या पुस्तकाच्याद्वारे नव्यानंच भेटली. प्रत्येक पान वाचताना आणि मुख्य म्हणजे फोटो पहाताना अक्षरश: भान हरपतं. ज्यांना "रा्नभूल" लागली आहे त्यांनी तर जरूर उराशी बळगावं असं हे पुस्तक आहे.
३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके :
मृत्युंजय - शिवाजी सावंत
व्यक्‍ती आणि वल्ली - पु ल
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
साद देती हिमशिखरे - जी के प्रधान
चीपर बाय द डझन - मंगला निगुडकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके :
श्यामची आई - साने गुरुजी
आय डेअर - किरण बेदी
मी कसा झालो - आचार्य अत्रे
अग्निपंख - ए पी जे अब्दुल कलाम
हसत जगावं - रमा मराठे

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे :
मृत्युंजय - शिवाजी सावंत - हे पुस्तक वाचून मला कित्येक वर्ष लोटली. प्रथम वाचलं ते शाळेत असताना. त्यापूर्वी कर्णाची ओळख फक्‍त "अमर चित्र कथा" मधूनच होती. त्यात कर्ण म्हणजे कौरवांचा सखा म्हणून रंगवलेली व्यक्‍तीरेखा होती. मला असं वाटतं की शाळेत आपल्याला फार "black and white" किंवा "good guys and bad guys" या धाटणीनं शिकवत असत. या पुस्तकानं मला अगदी लहानपणी एक वेगळा विचार करायला शिकवला. "stereotypical" विचारसरणी दूर करायला शिकवली. या पुस्तकातले दोन प्रसंग उगीचच फार लक्षात रहिले आहेत - आता अगदी शब्द आठवत नाहित, पण एक प्रसंग म्हणजे द्रोणाचार्यांनी घेतलेल्या नेमबाजीच्या स्पर्धेबद्दलचा - पोपटचा डोळा आणि अर्जुनाचं एकाग्र मनाची साक्ष देणारं उत्तर तर शाळेत अगदी पहिली-दुसरीपासून पाठ होतं. पण सावंतांनी या प्रसंगी कर्ण असता तर काय म्हटला असता हे फारच छान लिहिलय. मला अगदी तंतोतंत शब्द आठवत नाहीत, पण कर्ण म्हणतो की मला जर तोच प्रश्न विचारला असता, तर मी सांगितलं असतं की माझं शरीर हाच एक टोकदार बाण आहे असा विचार करून मी त्या पोपटाच्या डोळ्याकडे झेपावलो असतो!
दुसरा प्रसंग असा की राजसूय यज्ञाच्या वेळी कर्ण जेवा्यला बसलेला असताना दौपदी वाढायला आली. खाली बघून जेवताना अतिशय सुंदर पावलं ताटासमोर आल्यावर कर्णानं मान उचलली आणि द्रौपदीचा पदर ढळलेल्या अवस्थेत होता. यात खरं तर कर्णाचा काहीच दोष नव्हता. पण भर पंक्‍तीत द्रौपदीनं कर्णाचा खूप अपमान केला "कावळ्यानं राजहंसीकडे पाहू नये ..." हा कर्णावरचा अपमान मला फार घोर लावून गेला होता कारण पुढे द्रौपदीची अवहेलना करताना कर्ण त्यात सहभागी होतो त्याचं हे बीज होतं का काय असं मला वाटत रहिलं, आणि "न्याय्य आणि अन्याय्य" गोष्टिंमधे किती फिकट सीमारेषा आहे याचा विचार करायला मी सुरवात केली होती. असो... हे वाचून दोन तपांपेक्षा जास्त काळ उलटला आणि आज अचानक खूप दिवसांनी आवडत्या पुस्तकाचा विचार करायला लागल्यावर "मृत्युंजय"ची आठवण जागी झाली!

आता या लोकांना "tag" करते:-
सोनाली
nikone
केदार

Tuesday, March 28, 2006

मन का मन का affair

माझ्या blog चं शीर्षक वाचून एका चतुर मित्रानी हे शीर्षक अगदी सहज चेष्टा म्हणून सुचवलं. आणि मग ते डोक्यातून जाईचनात. खरचं, मन किती affairs करत असतं नाही? "मन वढाय वढाय ...", पक्ष्यानी पिकाबरोबर "flirting" करवं तसंच काहीसं. आणि गंम्मत म्हणजे अशी affairs करायला पूर्ण मोकळिक आहे कारण हे बहिणाबाईंनी वर्णन केलेलं flirting कोणी बघू शकत नाही म्हणून! मनाच्या affairs ना आळा घलण्यासाठी म्हणूनच आपल्याला शाळेत लहानपणापासून मनाचे श्लोक शिकवत असत.

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो

पण एखाद्या बंडखोर मुलाला जितकं समजवावं तितकं ते जास्तच बंडखोर होतं असं म्हणतात ना, तसंच मनाचे श्लोक घोकून होतं अशी माझी ठाम समजूत झाली आहे. एका अक्षाराचाही भावार्थ समजवून न घेता फक्‍त परीक्षा पास होण्यासाठी मी हे श्लोक रटवून रटवून पाठ करत असे. शिवाय "अकेले अकेले कहां जा रहे हो" च्या चालीवर श्लोक म्हणून आम्ही मुली मनाच्या श्लोकांचंही "affair" करत असू. रोज सकाळी न चुकता मनाचे श्लोक म्हणून एक अक्षरही आचरणात न आणणारे कित्येक लोक माझ्या माहितीत आहेत.

शाळेत आम्हाला एक खूप कडक बाई होत्या. सतत चिडचीड करत आणि छोट्या छोट्या कारणांवरून शिक्षा करत. आम्हा कुणालाच त्या आवडत नसत. मी अनेकवेळा त्यांची बोलणी खाल्लेली आहेत, एकदा तर छडी सुद्धा खाल्लेली आहे. एकदा त्या पडल्या आजारी. चांगल्या आठवडाभर रजेवर गेल्या. तेव्हापासून त्या सतत आजारी पडाव्यात असंच स्वप्नं मी रंगवत असे. फार नंतर मला असं कळलं की त्यांच्या घरची परिस्थिति फार अवघड होती म्हणून त्यांचा स्वभाव असा झाला होता. आणि मग मनातल्या या "flirting" ची माझी मलाच कीव आली होती.

थोडक्यात काय, अगदी लहानपणापासून ही अशी "affairs" मनात रंगतच आहेत! अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर अजूनसुद्धा डोईजड होणार्‍या colleague ची फजिती करण्याची "affairs" मनात चालूच असतात.... प्रयत्न इतकाच आहे की कुठल्याशा रंगेल "affairs" च्या गुंत्यात कुठेतरी कायमची अडकवणूक व्हायला नको म्हणजे मिळवलं!! सुरेश भटांच्या दोन ओळी कायम लक्षात आहेत....

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा....

Monday, March 13, 2006

पिल्लासाठी

"आई, तू कांगा मी रू, आणि बाबा पू आहे बरं का!" असं म्हणून मिशकिल हसणार्‍या माझ्या पिल्लासाठी.......

एकच छोटी जागा हृदयी मोठे त्याचे स्थान
चंद्र सूर्य तारे आणि नभांहून महान
वादळ नाही पोचत तेथे नाही उन्हाचा चटका
सोनुल्या तुझाचसाठी आहे ही जागा बरं का !

थंडि असो की पाऊस वारा किंवा वादळवेळ
असो सामना अंधाराचा असो उन्हाची झळ
असशिल तेथे बनेल अलगद या जागेचा झोपा
कितीही मोठा झालास तरी दुरूनच घेऊ पापा !

मार भरारी आकाशातुन सत्याकडे, तेजाकडे
या जागेतुन डोळे आमचे अविरत पाहतिल तुझ्याकडे
दर्यावर्दी होऊन जेव्हा जिंकशील तू समुद्र सात
जागेतुन या पाठीवरती राहिल आमचा सदैव हात !

Wednesday, March 01, 2006

अर्धाच प्याला

काही घरगुती वस्तू आणण्यासाठी मी newspaper मधली coupons शोधत होते. "आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचं coupon कधीच मिळणार नाही." मी माझ्या typical pessimistic स्वरात वैतागून म्हटलं. माझा नितांत आशावादी नवरा मला म्हणाला "अग, जी coupons सापडतायत त्याच गोष्टी का नाही आणत तू. It is all about your attitude. तुझा attitude बदललास तर इतकं वैतागायला नाही होणार." हे अगदीच किरकोळ उदाहरण झालं. पण पाडगांवकरांची ही कविता मला खरं तर खूप आवडते. वाचून अगदी प्रसन्न वाटतं.

पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं का भरला आहे म्हणायचं
ते तुम्हीच ठरवा.....

पण मला वाटतं की कधी कधी माणसं जरा या "अर्धा प्याला" संस्कृतीमधे जरा "overboard" च जातात. अगदी तळ गाठलेल्या प्याल्यालासुद्धा "अर्धा" भरलेला प्याला म्हणून celebrate करणं कितपत योग्य आहे? क्रिकेटच्या मॅचमधे शेवटच्या दोन ओव्हर्‌स आणि 70 रन्स राहिलेल्या असताना नऊवा गडी आऊट झाला तरी आपण जिंकणार आहोत असा समज करून घेणं म्हणजे आशावाद की निरागस अज्ञान? किंवा स्वत:चीच फसवणूक म्हणा ना ! निवडणुकीत प्रचंड लाखो मतांनी मागे असणारे नेते सुद्धा मुलाखतींमधे "अजून सगळी मतमोजणी झाली नाहीये" म्हणून अगदी टेकीला येईपर्यंत विजयाच्या आशेची मशाल नाचवताना दिसतात.

मला लहानपणी शिकलेलं हे सुभाषित आठवतंय

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला
बद्धा यया प्रधावन्ति मुक्‍तास्तिष्ठंति पङगुवत्‌

आशा नावची अशी एक चमत्कारिक बेडी आहे की जी बांधल्यावर माणूस धावतच सुटतो, तर जिच्यातून सुटका झाली की तो पांगळ्याप्रमाणे थबकूनच रहातो. प्रत्येकानच उराशी बाळगावी अशी "आशा" ही चीज असेल, तर या सुभाषितकारानं आशेला बेडीची उपमा का द्यावी? पंखांची का देऊ नये? मला नेहमी हा प्रश्न पडे. मग विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की या सुभाषितकारानं "rosy optimism" चे धोके जाणले असले पाहिजेत.

मी स्वत:लाच खूप वेळा विचारते, मी "pessimist" आहे का? खरचं नाही - मी फक्‍तं "cautious" आहे. खरं तर खूप काही तक्रार करावं असं काही माझ्या आयुष्यात घडलंय म्हणून नव्हे. पण "Murphy's Law" वर माझा अनुभवाअंती विश्वास आहे. शिवाय भरल्या पोटानी तहानलेल्या माणसांना "पेला अर्धा भरला आहे" ची शिकवण देणार्‌या लोकांचा मला फार राग आहे. म्हणूनच हेलन केलरनी तिच्या "Light in my darkness" पुस्तकात लिहिलेलं हे वाक्य मला कोणत्याही अर्ध्या भरलेल्या पेल्याच्या आशावादापेक्षा जास्तं भावून जातं - कारण त्यात आधी वास्तवाची कबूली आहे आणि मगच आशेचा किरण! ती म्हणते:-

"Although the world is full of suffering, it is also full of the overcoming of it."

Friday, February 24, 2006

Footprints

मी शाळेतच असतानाची गोष्ट आहे. कोणीतरी "Footprints" ही गोष्ट मला दाखवली होती. मला एक नि:स्सीम आत्मविश्वास देऊन गेली होती ही गोष्ट. परमेश्वराच्या नितांत सोबतीची ही कल्पना मला फारच भावून गेली होती. त्याच सुमारास आम्हाला शाळेमध्ये मराठीला रमाबाई रानड्यांचा "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...." नावाचा धडा होता. तुकारामांच्या या प्रसिद्ध अभंगाची ओळखही याच सुमारासची ! आम्हाला मराठी शिकवणार्‍या पाध्ये बाई इतका रंगवून हा अभंग शिकवत की "चालविसी भार सवे माझा" असा हा सोबती अगदी माझ्या सतत "मागेपुढे उभा सांभाळिसी" राहील ही अगदी खात्रीच पटून गेली होती म्हणा ना!

त्या वयातली संकटं ही छोटीच होती! परिक्षा हेसुद्धा तेव्हा संकट वाटे. पेपर छान गेला की मनाची समजूत होई की अगदी देवच पाठीशी होता. एखाद्या दिवशी गृहपाठ केला नसेल तर अगदी परमेश्वराचा धावा करायचा की आज बाई गृहपाठाबद्दल विसरून जाऊ देत. त्या वयातली संकटंही मोठी निरागस असायची. मागे वळून पहाताना आता वाटलं की का आपण इतक्या क्षुल्लक गोष्टींसाठी "त्या"ला बोलवायचो?

जसा आयुष्याचा प्रवास पुढे सरकत गेला तशी ही संकटं आपला चेहरा मोहरा बदलू लागली. त्यांच्यातली ती निरागसता संपून एकप्रकारची कुचेष्टा आणि पुढे तर हळूहळू क्रूरता भरू लागली. तरीपण संकट आलं की मला "Footprints" ची नेहमी आठवण येई. पण मग लक्षात आलं की वाटते तितकी काही ही गोष्टं खरी नाही. प्रत्येक वेळी "तो" धावून येईल याची काही खात्री नाही! संकटावर मात करण्यात अपयश आलं की मी खूप खिन्न होऊन आत असे. मग कायम आशावादाचा सल्ला देणारी माझी आई सांगायची, "अगं, यश ही परमेश्वराची कृपा आणि अपयश ही परमेश्वराची इच्छा असते." हे "convinient" उत्तर मला फारसं पटलं नाही. माझ्या "footprints" वरच्या नितांत श्रद्धेला धक्का पोचणारे अनेक प्रसंग घडतच जातात...... आणि मधूनच कधीतरी अगदी अनपेक्षितपणे मला मोठ्या संकटतून कोणीतरी अलगद बाहेर काढल्याची प्रचीती येते आणि मी पुन्हा "footprints" विश्वास ठेवते. ही अशी लपाछपी अजूनही चालू आहे.....

पण मग नीट विचार केला आणि लक्षात आलं की खरंच "त्या"नं हात धरून चालवलेलं चालेल का मला कायम? कदाचित माझाच "ego" तर आड येत नसेल ना? कदाचित माझ्या अंतर्मनातला "तो" जे सांगतो त्याच्याकडे मी दुर्लक्ष करते का? मग कवि अनिलांची (?) ही कविता सारखी आठवत रहाते....

हाती हात धरून माझा,
चालवणारा कोण तू?
जेथे जातो तेथे माझा,
काय म्हणुन सांगाती?
आवडतोस तू मला की नावडतोस?
माझे मला कळत नाही,
येवढे मात्र जाणवते की,
माझा हात धरून असे चालवलेले,
मला मुळीच खपत नाही!
स्वच्छंदाला माझ्या त्याचा करकोचा पडतो ना!
झिडकारून तुझा हात
म्हणून दूर पळत जातो
बागडतो, अडखळतो, धडपडतो,
केवळ तू कनवाळू पाठीशी उभा म्हणून
माझे दु:ख जाणवून
उगाच किंचाळत सुटतो
एरवी तू नसताना
पडलो अन् लागले तर
पुन्हा उठून हुंदडतो!
खांद्यावर हात माझ्या सदोदित
असा ठेऊ नकोस ना!
अशानेच माझी वाढ खुंटत जाते
असे मला वाटते ना!
बरोबरीचे वागणे हे खरोखरीचे आहे का?
खूप खूप माझी उंची एकाकीच
माझी मलाच वाढवू दे
तुझ्याहून नसली तरी तुझ्यासमान होऊ दे
तोवर असे दू्रदूरून, तुझा हात दूर करून
मान उंच उभारून
तुझ्याकडे धिटकारून पाहू दे!

Saturday, February 11, 2006

स्व:छंद छंद

माझं लहानपण अगदी स्व:छंदात गेलं. हवं ते करण्याचं, पाहिजे तिथे जाण्याचं, हवं ते शिकण्याचं, हवा तो छंद जोपासण्याचं मला स्वातंत्र्य असे. लहानपणी मला पक्ष्यांची पिसं गोळा करायची भारी हौस होती. आणि नव्या पिढीतली मुलं कशी Pokemon ची कार्ड "trade" करतात ना तशी आम्ही मुली ही पिसं "trade" करायचो. आगदी कावळ्याच्या काळ्याकुट्टं पण चमकदार पिसापासून जणु का दृष्टी असणार्‍या रंगीबेरंगी मोराच्या पिसापर्यंत अनेक पिसं आम्ही छंदिष्टासारख्या तासंतास कुरवाळत बसायचो. अशा पिसांची देवाण घेवाण करणाय्रा मुलींना आमच्या एक रुक्षं बाई "पिसाळलेल्या" मुलींचा गट म्हणत असंत. एका धीट सखीनं एक दिवशी या बाई वर्गात यायच्या आधी फळावर मोठ्या अक्षरात "पिसाळलेल्या" वर फुली मारून "peaceful" असं लिहून ठेवलं होतं.

मागे वळून पहाताना वाटतं की ही पिसं म्हणजे आपल्या सभोवतालच्या माणसांचीच प्रतिकं होती. काही छोटी, काही मोठी, काही लांबच लांब तर काही अगदी नखाएवढीच! काही गुबगुबीत मऊ, तर काही जणु काटेरी. काही रंगीबेरंगी असूनही थिल्लर वाटणारी, तर काही एकाच शांत रंगाची पण टक लावून बघतच ठेवणारी. काही शेपूट तुटलेली, काही सळ्सळणार्‍या लांबच लांब शेपटीची. काही अंगावर चिकटून बसणारी, आणि काही इतकी सुळसुळीत, की हातातही न ठरणारी. काही उभी धरली की अगदी ताठ रहाणारी, पण काही मात्रं सारखीच माना टाकणारी. उन्हाळ्याच्या दिवसात जोरात पंखा चालू असताना कधी जपून ठेवलेल्या पिसांचा हा ठेवा उघडला की ही वेडीपिशी पिसं आख्ख्या खोलीभर भिरभिरायची. बंधनातून मुक्‍तता मिळालेल्या पक्ष्यासारखीच भरार्‍या मारायची. जणु "स्व:छंद" या शब्दाचा अर्थच समजावून सांगायची......

स्व:छंद मी, हरहुन्नरी या भुईवरी भटकण्या
खिदळेन मी, चिडवेन मी मिचकावुनी पापण्या

क्षितिजावरी जाईन मी, डोकावुनी पाहीन मी
खोल दरिला आळवून पडसाद माझे ऐकेन मी

मनमुक्‍त मी सागराला आर्ततेने आळवण्या
विनवीन मी ओहळाला दोन हस्ते वळवण्या

घनरानी जाईन मी, मंद वाते शहारेन मी
दाट केवड्याच्या बनी ऊरभरुनी हुंगेन मी

झेप गगनी घेईन मी चांदण्या कवटाळण्या
सांगेन मी चंद्रमेला चांदणे मजवरी शिंपण्या

रानमाळी धावून मी, मनस्वी हुंदडून मी
अंधारता माऊलीच्या मायेत मग विसवेन मी

Tuesday, February 07, 2006

नव्या वाटा

लहानपणापासून मला काही नवीन हाती घ्यायचं म्हणजे एक अनामिक हुरहूर लागून रहायची. शाळा सोडून कॉलेजला जाताना, घर सोडून होस्टेलला जाताना, शिक्षण संपवून नोकरीला जाताना, देश सोडून परदेशी जाताना - तीच एक हुरहूर मनात घर करून असे. नव्या वाटेला लागताना सतावणारी ही हुरहूर शब्दांमध्ये सांगणं फार अवघड आहे. मागच्या वाटेवर ज्या गोष्टींनी लळा लावला त्यांना सोडण्याचं दु:ख, नवीन आवाहनांना सामोरं जाण्याची अतुरतता, पुढच्या वाटेवरच्या अनाहूत संकटांची भीती, नवीन अनुभव मिळणार म्हणून आणि नवीन माणसं जोडायला मिळणार म्हणून उरात भरलेला आनंद या सर्व भावनांचं एक वेगळंच मिश्रण झालं की ही हुरहूर लागे. मग आई मला शांता शेळक्यांच्या कवितेतल्या या दोन ओळींची आठवण करून देई. ही कविता आजतागायत मला सतत खूप दिलासा देते.....

पायाखालच्या जुन्या वाटा सरून नव्या घेतात त्यांची जागा
आणि पुन्हा प्रत्येक वळणावर असतातच डवरलेल्या फुलबागा....